महाराष्ट्रातील तुरुंग प्रशासनाने या महिन्याच्या सुरुवातीला कैद्यांसाठी आयोजित केलेल्या अभंग आणि भजन पठण स्पर्धेत सहभागी झालेल्या कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह परिसरात १३ जून रोजी पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 29 कारागृहातील एकूण 350 कैद्यांनी सहभाग घेतला होता
तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैद्यांना त्यांच्या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर माफी दिली जाईल. 13 जून रोजी पुण्यात झालेल्या महाअंतिम फेरीसाठी ज्यांची निवड झाली त्यांना त्यांच्या तुरुंगवासातील 90 दिवसांची माफी दिली जाईल. ज्यांना सांत्वन पारितोषिक देण्यात आले त्यांना 60 दिवसांची माफी दिली जाईल तर ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला परंतु जिंकू शकले नाहीत त्यांना 30 दिवसांची माफी दिली जाईल.
तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार यामुळे कैद्यांची मानसिकता बदलण्यास मदत होईल आणि त्यांची तुरुंगातून लवकर सुटका होण्यासही मदत होईल. माफी देण्याचा निर्णय तुरुंग विभागाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या तुरुंग नियमावलीनुसार घेण्यात आला आहे, असे तुरुंग विभागाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
या स्पर्धेत कोल्हापूर कारागृहातील कैद्यांना विजेते घोषित करण्यात आले तर येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी द्वितीय तर नाशिक कारागृहातील कैद्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत राज्यातील 29 कारागृहातील एकूण 350 कैद्यांनी सहभाग घेतला होता.
अभंग-भजन स्पर्धेत सहभागी झालेल्या कैद्यांना शिक्षेत विशेष माफी












