पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.३१ : अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांच्या कार्याला सलाम करण्यासाठी कनि महिला मंचतर्फे राखी पौर्णिमेचे निमित्त साधून बहिण–भावांचे अनोखे नाते रेशमी धाग्याने जोडण्यात आले.
एरंडवणा येथील अग्निशमन दलाच्या आवारात हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. कोथरूड केंद्र अधिकारी गजानन पाथरुडकर, एरंडवणा केंद्र अधिकारी राजेश जगताप, धानोरा केंद्राचे सहाय्यक अधिकारी रमेश गांगड, सेवानिवृत्त अधिकारी प्रमोद एकबोटे, कनि महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा कल्याणी कदम, उल्हास कदम तसेच एरंडवणे, कोथरूड, जनता वसाहत अग्निशमन दलातील जवान उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी आणि कनि संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती देताना कल्याणी कदम म्हणाल्या, महिला आणि वंचित मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थेचे कार्य तीन वर्षांपासून सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळवून देण्याच्या उद्देशानेही संस्था निस्वार्थपणे कार्यरत आहे. आगीसारख्या प्रसंगांमध्ये जीव धोक्यात घालून हजारोंचे प्राण व संसार वाचविणाऱ्या अग्निशमन दलातील जवान आणि अधिकाऱ्यांविषयी कृतज्ञना व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
घरात आगीच्या दुर्घटना घडू नयेत, घडल्यास काय उपाययोजना कराव्यात या विषयी पाथरुडकर आणि जगताप यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांचे प्राण वाचविणाऱ्या विनायक माळी, शैलेश दवणे, आनंतराव जाधव, अमोल शिंदे, विनय शिंदे आणि मनोज साळुंखे यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.
मान्यवरांचे स्वागत उल्हास कदम आणि कल्याणी कदम यांच्या हस्ते करण्यात आले.












