जितेंद्र आव्हाड त्यांच्यावर विनयभंगाच्या केसेस, अपहरणाच्या केसेस, 307 ची केस आहे. असे असतानाही ते कुठल्या नैतिकतेचे उपदेश देत आहेत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. आव्हाडांना भीती वाटत आहे की, त्यांच्या बाजूने जे कोण थोडेफार उरले आहेत त्यांचाही ओढा आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने आहे. यामुळेच आव्हाड वाटेल ते बोलत सुटले आहेत, असा आरोप आनंद परांजपे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे भर अधिवेशनात धिंडवडे काढले आणि ते उभ्या महाराष्ट्रानेही पाहिले आहे. अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्हाला पक्षाचे नाव, चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. राज्यातील स्थिती पाहता महायुतीचे 45 प्लस उमेदवार विजयी होतीलच, शिवाय ठाणे जिल्ह्यातील लोकसभेचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वासही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे तसेच पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला.
या वेळी परांजपे यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली. आव्हाड रात्रीचा काय पदार्थ खातात माहीत नाही. पण त्यानुसार ते बोलत असतात. खरेतर आव्हाडांना भीती वाटते की जे थोडेसे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी त्यांच्या बाजूने उरले आहेत त्यांचाही ओढा अजित पवार यांच्या दिशेने सुरू झालेला आहे. बीडमधून 20 नगरसेवक अजित पवारांसोबत येत आहेत. अशीच स्थिती राहिल्यास त्यांचा उरलेला पक्ष टिकेल की नाही, ही भीती आव्हाडांना सतावत आहे. यामुळे फार महत्त्व आव्हाड यांच्या राजकीय मतांना देऊ नये, असे आवाहन परांजपे यांनी केले. तसेच कळवा विधानसभा मतदारसंघातील मतदारही आव्हाडांना गांभीर्याने घेत नसल्याचाही दावा परांजपे यांनी केला.