पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १० : राज्यातील विविध टोल नाक्यांवर होणाऱ्या वसुलीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झालेले असून, राज्यात टोल हा सर्वात मोठा स्कॅम असल्याचा गंभीर आरोप (दि.१०) पत्रकार परिषदेदरम्यान केला होता. त्यांच्या या आरोपांवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १२ टोलनाक्यांवर वसुली बंद असल्याचे तसेच, MSRDC च्या ५३ नाक्यांवर कार, जीप आणि एसटीला सूट देण्यात आल्याचेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याचा जीआर ३१ ऑगस्ट २०१७ लाच जारी करण्यात आल्याचेही फडणवीस यांच्या कार्यलयाने सांगितले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (दि. ९) राज्यातील टोलमाफीसंदर्भात एक विधान केले होते. त्याबाबत माध्यमांमधून नेमक्या निर्णयासंदर्भात विचारणा होत असल्याचे कार्यालयाने म्हटले आहे.
तसेच यावर स्पष्टीकरणे देताना ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पथकर स्थानकांपैकी ११ पथकर स्थानकांवरील व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ५३ पैकी १ पथकर स्थानकावरील अशा एकूण १२ पथकर नाक्यांवरील पथकर वसुली बंद करण्यात आल्याचे फडणवीसांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण देताना सांगितले आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित २७ पथकर स्थानके तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या २६ पथकर स्थानकावरील अशा एकूण ५३ पथकर स्थानकांवरील कार, जीप व एसटी महामंडळाच्या बसेस अशा वाहनांना ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून पथकरातून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णयसुद्धा २०१७ मध्ये घेण्यात आला होता आणि त्याचा जीआर सुद्धा ३१ ऑगस्ट २०१७ रोजी जारी करण्यात आल्याचे फडणवीस यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण देताना सांगितले आहे.
‘खासगी लहान वाहनांना टोलमाफी आहे’ असं उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले ते धादांत खोटं आहे. इथून पुढे महाराष्ट्र सैनिक टोलनाक्यावर उभे राहतील आणि खासगी वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही आणि जर टोलवाल्यांनी बळजबरी केली तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचे राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.
जर, राज्यात दुचाकी, तीन चाकी आणि किंवा चारचाकी वाहनांना टोल माफ आहेत. मग आजपर्यंत टोलच्या नावाखाली जमा होणारी रक्कम कुठे जमा होत आहे? एकतर राज्य सरकार खोटं बोलत आहेत किंवा टोल कंपन्या लूट करत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.
मी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की, देवेंद्र फडणवीस म्हणालेत तसं दुचाकी तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना टोल माफ करा, आणि इतके दिवस जे पैसे गोळा झालेत तर ते कुठे गेले? आणि इतकं होऊन पण जर टोल वसूल केला जाणार असेल तर माझे महाराष्ट्र सैनिक टोल नाक्यांवर उभे राहून वाहनांना सोडायला लावेल आणि तरीही जर संघर्ष झाला तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. मग जे होईल ते होईल असा गर्भित इशारादेखील राज ठाकरेंनी दिला आहे.












