मारहाण का केली अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोघांना चार जणांच्या टोळक्याने लाकडी बांबू व बॅटने त्यांना मारहाण केली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे. हा प्रकार आकुर्डी परिसरातील पांढरकर वस्ती येथे घडला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
अली तय्यब सय्यद (वय-२० रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने मंगळवारी (दि.२७) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन नौशात हकीबुल्ला साह (वय-२१), मोहमंद मुबीन हकीबुल्ला साह (वय-१८), शमीम हकीबुल्ला साह उर्फ पुल्लु (वय-२७), सुजीत सुभाष पाल (वय-१८ सर्व रा. पांढारकर वस्ती, आकुर्डी) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०२, ३२४, ३२३, ३४ सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नौशाद व मोहमंद यांनी फिर्य़ादी व मृत अली यांना मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व अली आरोपी नौशाद याच्याकडे गेले होते. त्यावेळी आरोपींनी दोघांना लाकडी बांबुने मारहाण केली. तर शमीम याने त्याच्याकडे असेल्या लाकडी बॅटने मारहाण केली. तर सुजीत याने हाताने व पायाने मारहाण करुन जखमी केली. आरोपी शमीम याने फिर्यादी यांचा मित्र अली याच्या डोक्यात जोरात बॅट मारली. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरु असताना अली सय्यद याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास निगडी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सातपुते करीत आहेत.