कशाच्या आशेवर आम्ही जगायचे, रोज अन्न देणारा जो आहे त्याची तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची. शेतकरी कधीच अडवणूक करणार नाही. मला शेतकऱ्याचा जन्म नको असे शेतकरी कधीच म्हणणार नाही. जनावरांची भाषा आम्ही जाणतो, तुम्हाला आमची भाषा कळत नाही का? हे कधी संपणार, असा संताप ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यवस्थेला केला आहे.
मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे दोन दिवसांचे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनास सुरु झाले आहे. या कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होते.
नाना पाटेकर म्हणाले की, आई सांगायची सोने १६ रुपये तोळा होते. आता ते ५० हजार रुपयांवर पोहोचले. सोन्याचा भाव वाढला मग आमच्या गहू-तांदळाचा भाव का वाढत नाही. शेतीमालाला रास्त भाव हवा. पण प्रत्येक गोष्ट सरकारकडे मागून मिळत नाही. त्यामुळे सरकारकडे मागू नका, कुठलं सरकार करायचं हे ठरवा, असे आवाहन त्यांनी शेतकरी वर्गाला केले.
पाटेकर पुढे म्हणाले, मला राजकारणात जाता येत नाही, कारण जे पोटात ते ओठात येते, मला पक्षातून काढतील. कुठले आदर्श ठेवता आमच्या नव्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे. नटसम्राट आज जर मला करायला सांगितले तर मी वेगळ्या पध्दतीने करेन.
माझे नटसम्राटाचे दु:ख जे आहे ते चार भिंतीमधील आहे. गोंजारलेले दुःख आहे,
आम्ही आमचे सर्व आयुष्यच आभाळाखाली ठेवलेले आहे. आमच्या पिकाला तिजोरी नसते,अशी शेतकरी वर्गाची खंत त्यांनी बोलून दाखवली.