पुणे : शहरानजीकच्या गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक असून देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का याबाबत विचार सुरू आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या हस्ते लोहगाव येथे लोहगाव- वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, धानोरी सर्वे नं. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, माजी आमदार रामभाऊ मोझे, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे या वेळी उपस्थित होते.