पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. ०१ : एमआयटी आर्ट डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या स्कूल ऑफ वैदिक सायन्सेस् द्वारे भारतीय ज्ञानपरंपरा या विषयाशी संबंधित मानसशास्त्र वर आधारित ‘भारतीय मनोविज्ञानाचा पाया: विद्यार्थ्यांचे हँडबुक’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
याप्रसंगी पद्मभूषण डॉ. विजय भटकर, विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ. मंगेश कराड, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे डॉ. शरद कुंटे, डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्र.कुलगुरु डॉ. प्रसाद जोशी, प्रसिद्ध फिजिसिस्त डॉ. अॅलेक्स हॅन्की, येमुल गुरुजी, पुस्तकाचा लेखिका डॉ. माधवी गोडबोले, प्रा. सागर विद्वंस् व अनन्या शास्त्री, डॉ. प्रिया सिंग, डॉ. अश्विनी पेठे, डॉ. नचिकेत ठाकूर, डॉ. मिलिंद ढोबळे, डॉ. नीरजा जैन आदि मान्यवर उपस्थित होते.
पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करताना, या पुस्तकात भारतीय मानसशास्त्रावरील मूलभूत व आधारभूत गोष्टींचा अंतर्भाव केलेला असून त्यामागील उद्देश हा अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. तर आपल्या भाषणामध्ये डॉ. कुंटे यांनी भारतीय ज्ञानपरंपरा नक्की काय आहे, हे समजावून सांगताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये या विषयावर आणखी काम करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. तसेच विद्यार्थी शिक्षक व सामान्य वाचकवर्गासाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी पडेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना प्रा.डॉ.कराड म्हणाले की, आज प्रत्येक जन आपल्या अवतीभवतीच्या सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक समस्यांमुळे ग्रस्त आहे. त्यामुळे रोज भेडसावणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भारतीय मानसशास्त्राचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपयोग होऊ शकतो. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीचे सूत्रच जणू या पुस्तकामध्ये दिलेले आहे, ज्यांचा वापर करून आपण जिवनातील सर्व प्रश्नांची उकल करू शकतो.
यासह, आपल्या स्वागत पर भाषणामध्ये डॉ. गोडबोले यांनी हे पुस्तक लिहिण्यामागील भूमिका सविस्तर प्रतिपादित केली. तसेच, सहलेखक प्रा. सागर विद्वंस आणि अनन्या शास्त्री यांनी आपला पुस्तकलेखनाचा प्रवास यावेळी उलगडून दाखवला.
गाभारा प्रकाशनाच्या वैष्णवी गोडबोले यांनीही या पुस्तकाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल आपल्या भावना यावेळी मांडल्या. राष्ट्रगीताने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय विद्यार्थिनी आकांक्षा पाटील व अंशिका मल्होत्रा यांनी केले.












