पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. २८ : मराठा आरक्षणाचा तिढा वाढताना दिसत आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. गावागावांमध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना, पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. अशातच मराठा बांधवांच्या आत्महत्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. माझ्या प्राणाची आहुती देत आहे म्हणत मराठा आरक्षणासाठी सरपंचाने आपले आयुष्य संपवले आहे. मराठा आरक्षणासाठी सरपंचाने आयुष्य संपवल्याचा हा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातून समोर आला आहे.
व्यंकट नरसिंग ढोपरे (वय ६०, मूळ रा. उमरदरा, ता. शिरूर आनंदपाळ, लातूर) असे आयुष्य संपविणाऱ्या सरपंचाचे नाव आहे. “मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. खूप वेळा सरपंच या नात्याने गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन संघर्ष केला. पण सरकारला दया आली नाही” अशा आशयाची चिठ्ठी लिहून ढोपरे यांनी नदीत उडी मारून आपले आयुष्य संपवल्याची माहिती समोर येतेय.
ढोपरे काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा संदीप याच्या नऱ्हे आंबेगाव येथील घरी राहायला आले होते. ढोपरे यांची मुलगी आणि जावई हे भोसरी परिसरात राहतात. शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी साडे अकराच्या सुमारास ढोपरे हे आळंदी येथे देवदर्शनाला जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले. तासाभरानंतर त्यांच्या सुनेने घरातील कपडे धुण्यासाठी घेतले तेव्हा सासरे ढोपरे यांच्या शर्ट च्या खिशात वरील आशयाची चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये “खिशात मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी नाकारली गेली. त्यामुळे तो बेकार फिरत आहे. गावातील ६० वर्षांपुढील वृद्धांना शासनाची पेन्शन योजना मिळावी म्हणून मी अनेकांचे अर्ज शासन दरबारी दाखल केले. पण तहसीलदारांनी ही योजना दिली नाही.
अधिकारी आणि राज्यकर्ते केवळ स्वतःची खळगी भरण्यात व्यस्त आहेत. आरक्षण मिळत नसल्याने मी नैराश्यातून माझ्या प्राणाची आहुती देत आहे,” असे लिहिलेला मजकूर होता. ही बाब घरात समजताच ढोपरे यांच्या मुलाने त्यांना फोन केला. तेव्हा मी नैरश्यात आहे. पण काही करणार नाही असे सांगितले. त्यामुळे संदीप यांनी भोसरी येथे बहिणीच्या घरी धाव घेतली. तेथून ढोपरे यांचे जावई किरण नितुरे आणि संदीप यांनी ढोपरे यांना व्हिडिओ कॉल लावला. तुम्ही असे काही करू नका. आम्ही आळंदी मध्ये येतो सांगितले. दुपारी साडे तीन पर्यंत ढोपरे यांचा मोबाईल सुरू होता. त्यानंतर बंद झाला.
व्हिडिओ कॉल झाल्यावर संदीप आणि किरण या दोघांनी आळंदी मध्ये जाऊन शोध घेतला. पण ते कुठेच सापडले नाहीत. त्यामुळे इंद्रायणी नदी पात्रालगत ढोपरे यांचा शोध घेत असता, साखरे महाराज यांचे मठ जवळील सिद्धबेट बंधाऱ्यावर व्यंकट ढोपरे यांचे बुट, मोबाईल, पिशवी त्यामधे काही कागद सापडले. त्यामुळे जावई किरण नीतूरे यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करीत याची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी रात्रभर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने ढोपरे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासून पुन्हा ढोपरे यांचा शोध घेत असताना त्यांचा मृतदेह मिळून आला. आळंदी पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.












