शिरुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे म्हाडाचं अध्यक्ष पद दिलं म्हणजे मला गप्प बसवण्यासाठी दिलं असा गैरसमज कोणीही करुन घेऊ नये. मी 2024 ला लोकसभा निवडणूक लढवणार आणि महायुतीचाच उमेदवार राहणार, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलाय. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. तसंच निवडून आलेला खासदार गेल्या पाच वर्षांपासून लोकांना दिसला नाही, मात्र मी खासदार नसतानाही गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस काम करतोय, अनेक विकासकामं केले आहेत, असं म्हणत त्यांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केलाय.
महायुतीचा उमेदवार मीच : कोल्हापुरात शिवसेनेचं अधिवेशन झालं. या अधिवेशनामुळं राज्यातील शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार व शिवसेना नेते कोल्हापुरात आले होते. या सर्व नेत्यांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही अंबाबाईचं दर्शन घेतलं. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना नुकतंच पुणे म्हाडाचं अध्यक्षपद देण्यात आलंय. मात्र, यामुळं शिरुर लोकसभेच्या रिंगणातून आढळरावांना बाहेर काढल्याची चर्चा आता रंगू लागली होती. मात्र, यावर पहिल्यांदाच आढळराव पाटील यांनी भाष्य केलंय. यावर बोलताना ते म्हणाले, “गरिबांना घर मिळणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ग्रीन प्रोजेक्ट आहे. गोरगरीब जनतेला घरं मिळण्याचा संकल्प आहे. मुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन. मात्र, याचा अर्थ असा नाही की मी लोकसभा लढवणार नाही. मला गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं असा कुणीही गैरसमज करून घेऊ नये. मी 2024 ला लोकसभा निवडणूक लढवणार आणि महायुतीचाच उमेदवार राहणार यात तीळ मात्र शंका नाही.” त्यामुळं त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एकप्रकारे आपल्या उमेदवारीची घोषणाच केलीय. तसंच गेल्या दीड वर्षापासून म्हाडाचं अध्यक्ष पद मला देणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात होतं. निवडणूक आणि या पदाचा काही एक संबंध नसल्याचं आढळराव पाटील म्हणाले.