पुणे : नाट्यछटा सादरीकरण हा अत्यंत अवघड प्रकार आहे. स्पर्धेत सहभागी मुलांनी सादर केलेल्या नाट्यछटा बघताना त्यांच्यात आत्मविश्वास दिसून आला ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही कौतुक केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट-नाट्य कलावंत सुनील गोडबोले यांनी केले. पैशामुळे केवळ ‘वील’ तयार होते तर संस्कारांमुळे ‘गुडवील’ तयार होते. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या माध्यमातून मुलांवर होत असलेले संस्कार माणूस म्हणून घडण्यात खूप उपयुक्त आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ निवारा वृद्धाश्रम सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण समारंभात गोडबोले बोलत होते. पुणे विभागातील स्पर्धेचे यंदाचे 32वे वर्ष आहे. ‘नवक्षितीज’च्या विश्वस्त स्मिता शेट्टी, मित्र मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त स्वाती भावे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, दिपाली निरगुडकर, संध्या कुलकर्णी मंचावर होते.
स्वाती भावे म्हणाल्या, शिक्षण फक्त पैसा मिळविण्यासाठी असू नये तर चांगला माणूस घडविणारे शिक्षण मिळायला हवे. कलांमधून मानसिक विकास होत असल्याने जीवनात कलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
नाट्यछटा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पालक मुलांना प्रोत्साहन देत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे स्मिता शेट्टी म्हणाल्या. स्पर्धेच्या अंतिम फेरीतील परिक्षक युवा अभिनेता नचिकेत पूर्णपात्र याने मनोगत व्यक्त केले.
अमोल जाधव लिखित ‘अभिजात नाट्यछटा’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसन्न सोहनी, अनुराधा कुलकर्णी, पूजा पारखी यांनी निकाल जाहीर केला. नाट्यछटा स्पर्धेच्या उपयुक्ततेची माहिती प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविकात सांगितली.












