पुणे : वाहतूककोंडीतून अखेर मोकळा श्वास मिळेल, या आशेवर असलेल्या चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा आनंद लुटणाऱ्या नागरिकांना वाहतूककोंडीचा प्रश्न अजूनही कायम असल्याने पश्चाताप होऊ लागला आहे. उड्डाणपुलावरून सायंकाळच्या वेळी बाहेर पडणारे प्रवासी रोजच वाहतूक कोंडीत अडकत असल्याचे दिसून येते. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसतानाही घाईघाईने उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पुण्याचे सल्लागार अभियंता भरत तोडकरी म्हणाले, “सध्या आम्ही चांदणी चौक उड्डाणपुलावर अंडरपास बांधत आहोत. यासाठी आम्ही मुंबई दिशेकडे आणि बेंगळुरू दिशेला संध्याकाळच्या वेळी 6 लेनपैकी 4 लेन खुल्या ठेवत आहोत. आमचे बरेच काम पूर्ण झाले आहे. अंडरपाससाठी गर्डर बसवणे आणि त्यासाठी स्लॅब बांधणे बाकी आहे. तथापि, आम्ही कामाला गती दिली आहे जेणेकरुन पुढील 2 ते 3 महिन्यांत ते वाहतुकीला अडथळा न आणता पूर्ण होईल.”
मिळालेल्या माहितीनुसार, या उड्डाणपुलाचा दररोज वापर करणारे लोक आता सकाळ आणि रात्रीच्या गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूककोंडीत अडकून उड्डाणपुलाचे काम हवे तसे होत नसल्याच्या तक्रारी करत आहेत. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसतानाही अधिकाऱ्यांनी घाईघाईने मोठा कार्यक्रम साजरा केल्याचा आरोप त्यांचा आहे.












