राज्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत केवळ विकासकामांच्या जोरावर महायुतीचे ४५ पेक्षाही अधिक उमेदवार निवडून येणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवडच्या वतीने निगडी येथे बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा खा. तटकरे बोलत होते. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याणकाका आखाडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. तटकरे यांनी शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सेल अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, फ्रंटल तसेच बूथ कमिटी यांच्या कामकाजाची पूर्ण माहिती घेतली. पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या सर्व एकूण बूथ, त्याची रचना याबाबत सविस्तर माहिती घेऊन सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरात केलेल्या विकासकामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. देशाचा झपाट्याने होणारा विकास तसेच राज्यात महायुतीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून अजित पवार घेत असलेले कष्ट नाकारून चालणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून असनून पक्षाला बळकटी देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा खा. तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि सुरज चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसभा निवडणुकीच्या सुरू असलेल्या तयारीचा सविस्तर आढावा सादर केला. बुथनिहाय सुरु असलेली तयारी, मतदार याद्या, भाग याद्या यासंदर्भात सुरू असलेली तयारी, कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात असलेला उत्साह या बाबी स्पष्ट करतानाच तिन्ही विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अधिकाधिक मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास गव्हाणे यांनी व्यक्त केला. मावळ आणि शिरूर मतदारसंघातील महायुतीचा कोणीही उमेदवार असला तरी त्याचे काम चांगल्यापद्धतीने करून विजय आपलाच होणार, अशी खात्री गव्हाणे यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षांनी यावेळी निवडणुकीच्या तयारीची सखोल माहिती दिली. तसेच विविध सेलच्या अध्यक्षांनी निवडणुकीच्या तयारीबाबतचा आढावा सादर केला.
या बैठकीस माजी आ. विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर,माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी महापौर अपर्णा डोके, ज्येष्ठ नेते मोहम्मद भाई पानसरे, शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, शाम लांडे, फजल शेख, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, मा. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,संतोष बारणे,महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, भोसरी विधानसभा पंकज भालेकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, महिला निरीक्षक शितल हगवणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते तथा मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, मयूर कलाटे, संजय वाबळे, विक्रांत लांडे, संजय नेवाळे, राजू बनसोडे, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अमिना पानसरे ,बन्सी पारडे, निलेश पांढारकर, प्रज्ञा खानोलकर, संगीता नानी ताम्हाणे, मनोज खानोलकर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीचे प्रास्ताविक पक्ष प्रवक्ते तथा मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे व सूत्रसंचालन खजिनदार दीपक साकोरे यांनी केले.