मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आडघाडीतील घटक पक्षांमध्ये लोकसभेच्या जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरु आहे. अशातच महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी मीडियासमोर नाराजी जाहीर केली. यावेळी त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून माझ्या मुलाला हेतुपुरस्सर त्रास दिला जातोय, असा आरोप केला आहेत.
रामदास कदम म्हणाले, २००९ मध्ये शिवसेनेची भाजपसोबत युती असूनही भाजपाने मला गुहागरच्या विधानसभा निवडणुकीत पाडलं हे वास्तव आहे. आणि आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. स्थानिक आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून त्यांच्याच मतदारसंघात विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनं केली जात आहेत. स्थानिक आमदाराला त्रास देतायत, हे सगळं हेतूपुरस्पर चाललं आहे. असं असेल तर भविष्यात भाजपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याची भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे.
रामदास कदम असंही म्हणाले कि, महाराष्ट्रात भाजप जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत.
प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. आम्ही (शिंदे गट) मोदी आणि शाहांकडे बघून इथे (एनडीए) आलो आहोत. मागील निवडणुकीत काय झालं याची मला माहिती नाही. परंतु, भाजपाने केसाने गळा कापू नये, अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे, असा सज्जड दम देखील त्यांनी यावेळेस भाजपला दिला आहे.
यामुळे, भाजपनं फोडाफोडीचं राजकारण करून मित्रपक्षांना एकत्रित घेतलंय खरं. पण, लोकसभेचं जागावाटप महाराष्ट्रात भाजपला मात्र जड जाणार असं दिसतंय. भाजपची परिस्थिती महाराष्ट्राखेरीस अन्य राज्यातही अशीच आहे का? हे येत्या काळात समजेलंच