दिल्ली : शेतकरी आणि केंद्र सरकारमधील (दि.१२) रोजी झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आजपासून (दि.१३) ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. सकाळी १० पासून शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश मधील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारला घेरण्यासाठी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. यामुळे दिल्लीत येणाऱ्या सीमांवर पोलिसांकडून सिंमेट बॅरिकेट्स, लोखंडी तारा आणि रस्त्यावर लोखंडी खिळे टोकण्यात आले आहेत.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत चंदीगडमध्ये सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र दिल्लीकडे जाणारा मोर्चा थांबवण्यासाठी कोणताही तोडगा निघू शकला नाही. यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये पाच तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे शेतकरी संघटना मंगळवारी दिल्लीत आपले आंदोलन सुरू करणार आहेत