पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चालता बोलता इतिहास असलेले कार्यवाह, कवी, गझलकार दीपक करंदीकर यांचे बुधवारी रात्री निधन झाले. बुधवारी रात्री साडेबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करंदीकर हे गेल्या चार दशकांपासून गझलकार आणि कवी म्हणून ओळखले जात होते.
दीपक करंदीकर हे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या प्रमुख संस्थेचे स्थानिक कार्यवाह म्हणून गेली ३० वर्षे कार्यरत होते. त्यांचे धुनी गझलांची (२००१) कविकुल (२००९) हे गझलसंग्रह व कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. गझलगंगा हा गझलसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर होता. अभिनव श्री व्यंकटेश माहात्म्य (वय २०१६), संगीत श्रीनिवास -पद्यावती विवाहनाट्य -पाच अंकी संगीत नाटक (२०२०) तसेच श्री तिरुपतीवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.