पुणे प्रतिनिधी
हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली.
गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. कुलकर्णी यांच्या डोक्याला ४ टाके पडले आहेत. डोक्यावरचा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले. अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता. हल्लेखोर पळून गेल्यानंतर हेरंब आणि सुनील कुलकर्णी यांनी सिव्हील हॉस्पिटलला जाऊन उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला.
या संदर्भात हेरंब कुलकर्णी यांची पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी फेसबुक वर पोस्ट करत ‘४८ तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे.
आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे… सर आता झोपून आहेत पण तब्येत ठीक आहे.’ ‘महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का?’ असा संतप्त प्रश्न प्रतिमा कुलकर्णी यांनी या पोस्ट मध्ये विचारला आहे. सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना राजकारणातून वेळ मिळाला की सामाजिक काम करणार्या शिक्षक हेरंब कुलकर्णी यांच्या कडे ही पहावे असे या पोस्टच्या अखेर मध्ये म्हटले आहे.












