पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. १३ : खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, मूग व उडीद या ११ पिकांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेता यावे आणि त्यांच्यात स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तालुक्यामध्ये लागवड क्षेत्र १ हजार हेक्टर हून अधिक आहे अशा सर्व पिकांकरिता ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरिता भाग घेण्यासाठी ३०० रुपये प्रति शेतकरी प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क राहील.
एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरुन आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. यापूर्वी तालुका पातळीवर कधीही प्रथम तीन क्रमांक आलेले शेतकरी जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास पात्र असतील. त्याचप्रमाणे यापूर्वी जिल्हा पातळीवर प्रथम तीन आलेले शेतकरी राज्य पातळीवर सहभागी होण्यास पात्र असणार असून तालुका व जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धा स्वतंत्र होणार आहे.
खरीप हंगामातील मूग व उडीद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै व भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.












