![]()
पुणे : राज्याच्या तुरुंग विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात ई-कारावास (आयसीजीएस) उपक्रमांतर्गत ई-मुलाखत तरतूद सुरू केली आहे. या तरतुदीमुळे इतर देशांतील कैद्यांना त्यांचे नातेवाईक किंवा वकिलांशी बोलता येणार आहे. ते त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधू शकतात. यावर्षी ४ जुलै रोजी ही सेवा सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत राज्यभरातील ३ हजार कैद्यांनी या सेवेचा वापर केला आहे. सध्या, राज्यात बांगलादेश, केनिया, कोलंबिया, इराण, इराक, ब्राझील, थायलंड, चीन, नेपाळ आणि इतर अनेक देशांतील 600 हून अधिक कैदी आहेत. या सर्वांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. परदेशातील कैद्यांचे कायदेशीर हक्क सुनिश्चित करण्यासाठी ही सेवा प्रदान करण्यात आली आहे.
त्यांचे नातेवाईक आणि वकील नेहमी भारतात येऊ शकत नाहीत, आणि म्हणूनच, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यांना त्यांच्या वकिलांशी बोलण्यात मदत करून त्यांच्या कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करण्यात ही सेवा मोठी भूमिका बजावत आहे. तसेच नातेवाईकांना भेटू न शकल्याने कैद्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक कारागृहाला किमान २५ डेस्कटॉप आणि लॅपटॉप देण्यात आले आहेत. कैद्यांच्या नातेवाइकांनी त्यांच्यासोबत कॉलची पूर्व-नोंदणी करण्यासाठी एनपीआयपी पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे कैद्यांना त्यांच्या वकिलांशी बोलण्यास मदत होईल आणि तुरुंगातून लवकर सुटका होईल. त्यामुळे तुरुंगातील गर्दीही कमी होईल.
मात्र, सध्या ही सुविधा दहशतवाद किंवा संघटित गुन्ह्यांसाठी दाखल असलेल्या कैद्यांसाठी दिली जाणार नाही आणि जे या सुविधेचा गैरवापर करताना आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. “या सुविधेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना देण्यात आली आहे,” गुप्ता पुढे म्हणाले.
सुपेकर म्हणाले, “आम्ही प्रत्येक कारागृहात ई-मुलाखतच्या तरतुदीबद्दलचे फलक आणि फ्लेक्स लावले आहेत जेणेकरून त्याची जागरूकता वाढेल आणि अधिकाधिक लोकांना याची माहिती द्यावी जेणेकरून ते त्याचा कार्यक्षमतेने वापर करू शकतील.” नुकतेच येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका परदेशी कैद्याने आपल्या कुटुंबीयांशी बोलण्यासाठी ही सेवा वापरली.
हा कैदी मूळचा नेपाळचा असून त्याचे नातेवाईक त्याला भेटायला येऊ शकले नाहीत. त्यामुळे ई-मुलाखत सेवेच्या माध्यमातून तो १२ वर्षांनंतर पत्नी आणि मुलांशी बोलू शकला. येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील धमाल म्हणाले, “या उपक्रमांतर्गत कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी आठवड्यातून दोनदा १५ मिनिटे बोलण्याची परवानगी आहे.” यापूर्वी संबंधित कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांना कारागृहाबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. आता ई-मुलाखत सुविधेमुळे त्यांना स्वतःची नोंदणी करणे आणि कैद्यांशी बोलणे सोपे झाले आहे.












