पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २६ : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तर उर्वरीत पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या ११ पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पीक स्पर्धा घेण्यात येते.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्ररित्या भरावयाचे असून सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी १५० रुपये असेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकाची स्वत:च्या शेतात भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), विहित प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आदिवासी शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी तालुका पातळीवर प्रथम ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार रुपये असे बक्षीसाचे स्वरुप असेल. तर जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस तसेच राज्यपातळीवर प्रथम बक्षीस ५० हजार रुपये, द्वितीय ४० हजार तर तृतीय बक्षीस ३० हजार रुपये राहील.
स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या https://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कृषी आयुक्तालयामार्फत कळविण्यात आले आहे.












