पिंपरी, पुणे (दि.२० जुलै २०२३) वास्तू विशारद सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, पर्यावरण पूरक बाबींचा विचार वास्तू रचनेत करतो. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आधुनिक वास्तू उभी करण्याचा प्रयत्न वास्तू रचनाकार करत असतो. त्यामुळे वास्तू विशारद हा समाजाला जोडणारा दुवा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वास्तू विशारद सुभाष शहा यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन यांच्यावतीने ‘वास्तू रचना – नियोजन शिक्षण, संशोधन आणि व्यवसायाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ’ या विषयावरील दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या समारोपप्रसंगी आर्किटेक्ट सुभाष शहा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बीएनसीएच्या संशोधन आणि विकास प्रमुख डॉ. वसुधा गोखले, एलटीएचे प्रमुख आर्किटेक्ट लक्ष्मण थिटे, अनंतराव पवार आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कोळी, एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, न्यूझीलंड येथील आर्किटेक्ट ज्युलियन रेनी आदी उपस्थित होते.
दरम्यान सकाळच्या सत्रात हैदराबाद येथील जवाहरलाल नेहरू वास्तुकला आणि ललित कला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कविता दरियानी राव यांनी
वास्तू कला, वास्तू रचनेतील नवकल्पना, संशोधन यावर मार्गदर्शन केले. तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सर्वसमावेशक वास्तू उभारल्या पाहीजेत अशी अपेक्षा डॉ. राव त्यांनी व्यक्त केली.
डॉ. वसुधा गोखले म्हणाल्या की, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी ही संपत्ती असून प्रत्येकाच्या गुणसंपन्नतेचा, ज्ञानाचा शैक्षणिक उन्नतीसाठी योग्य वापर झाला पाहिजे. महाविद्यालय आणि व्यवस्थापन यांच्यातील विश्वास यामुळे शैक्षणिक संस्थेचा नावलौकिक वाढतो. वास्तू रचनेतील कल्पकता, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे समाज आणि पर्यायाने देशाच्या विकासाला चालना मिळेल.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आर्किटेक्ट शाश्वती सिंन्हाल, ऋतुराज कुलकर्णी, तन्वी गणोरकर, अक्षता बेहरे, दक्षा देशमुख, प्रियांका गजभर, प्रियांका डुमणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
स्वागत डॉ. महेंद्र सोनवणे, सूत्रसंचालन आर्किटेक्ट नीलिमा भिड़े व ऋतुजा माने यांनी केले. परिषदेचा अहवाल शाश्वती सिन्हल व तन्वी गणोरकर यांनी सादर केला. ऋतुराज कुलकर्णी यांनी आभार मानले.
एस. बी. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेचा समारोप












