पुणे : आंबेडकरी चळवळीला उभारी देण्याचे काम महाकवी वामनदादा कर्डक यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या कार्याला बाबासाहेब यांचे आशीर्वादही लाभले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा धम्मध्वनी म्हणजे वामनदादा कर्डक होय, असे प्रतिपादन प्राचार्य रतनलाला सोनग्रा यांनी केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे महाकवी वामनदादा कर्डक स्मृती पुरस्कार वामनदादा कर्डक यांचे सहकारी प्राचार्य रतनलाल सोनग्रा आणि महाकवी राजानंद गडपायले यांच्या पत्नी शांताई गडपायले यांना रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सोनग्रा सत्काराला उत्तर देताना बोलत होते. देशाच्या संविधानाची प्रत, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेविका लता राजगुरू अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, पंडित वसंतराव गाडगीळ, शिवसेनेचे संजय मोरे, वसंत साळवे, काशिनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.
वामनदादा कर्डक यांच्या कार्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मिळालेला आशीर्वाद तसेच कर्डक यांच्यासमवेत चळवळीतील आठवणींना सोनग्रा यांनी उजाळा दिला. वामनदादा कर्डक यांनी डॉ. बाबासोहब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार केल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वामनदादा कर्डक यांच्यासारख्या व्यक्तींची आज उणिव भासत आहे. देशाला विचारांनी दिशा देणाऱ्यांची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनाविषयीची माहिती संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी प्रास्ताविकात दिली. उपस्थितांचा सत्कार आणि आभार लता राजगुरू यांनी मानले.












