पुणे | प्रतिनिधी
पुणे : सौदी अरेबियात नोकरीचे आमिष दाखवून पुण्यातील तीन महिलांसह चौघींचा छळ केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दलालांनी या गरीब महिलांची प्रत्येकी चार लाख रुपयांत विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या पाठपुराव्यामुळे महिलांना भारतात परत आणण्यात यश आले आहे.
मुंबईतील दलाल नसरीन भाभी, अब्दुल हमीद शेख, शमिमा खान आणि हकीम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मार्केट यार्ड भागातील दोन महिलांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगरमधील एका महिलेने गरीब महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत त्यांना सौदी अरेबियात सफाई कामगाराची नोकरी आहे. या कामाचे दरमहा ४० हजार रुपये वेतन मिळेल, असे सांगितले.
या आमिषाला बळी पडून महिलांनी मुंबईतील दलाल महिलांशी संपर्क साधला.
दलाल महिलांनी त्यांना सौदी अरेबियातील रियाध शहरात साफसफाईचे काम मिळवून दिले. परंतु तेथील व्यक्तीने त्यांना डांबून छळ सुरू केला. वेळेवर जेवण न देताना काम करवून घेतले जात होते. त्याला कंटाळून महिलांनी दलालांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी भारतात परत येण्यासाठी चार लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मे महिन्यात आखाती देशात महिलांच्या होणाऱ्या तस्करीबाबत आवाज उठवला होता. या महिलांनी सोशल मीडियावर तो व्हिडिओ पाहून आयोगाशी इ-मेलद्वारे संपर्क साधला.
चाकणकर यांनी त्या महिलांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी सौदी अरेबिया आणि भारतीय दूतावासाशी संपर्क साधून या महिलांना भारतात परत आणण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर पुण्यातील तीन महिलांसह चेन्नईतील एका महिलेला परत आणण्यात यश आले.
राज्य महिला आयोगाने महिलांची तस्करी रोखण्याबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. यामागे मोठे रॅकेट असून, या प्रकरणात दलालांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मायदेशी परतलेल्या महिलांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीने आखाती देशातून आणखी आठ ते दहा महिलांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत..
-रुपाली चाकणकर, अध्यक्षा- राज्य महिला आयोग.












