राज्यभरात मराठा आरक्षणचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. हे होत असताना त्या पार्श्वभूमीवर गावोगावी राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याबाबतचे ठराव ग्रामस्थांकडून केले जात आहेत. मावळ तालुक्यातील कातवी गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंद केला आहे.
जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, अथवा तसा निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने गावात येऊ नये, असे वक्तव्य या समजाकडून करण्यात आला आहे, तसे झाले तर त्यानंतर होणाऱ्या घटनेला प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदन सकल मराठा समाजाने तहसिलदारांना दिले आहे.
याप्रसंगी वैभव पिंपळे, अविनाश चव्हाण, प्रदीप चव्हाण, शैलेश चव्हाण, दत्ता पिंपळे, रवि चव्हाण, नवनाथ चव्हाण, राम चव्हाण, अजिंक्य चव्हाण, रोहन मावळकर, अनिकेत चव्हाण आदी उपस्थित होते. कातवी गाव येथील सकल मराठा समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही किंवा तसा निर्णय होत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गावात येऊ नये, जर कुणीही आरक्षणाच्या निर्णयाच्या शिवाय गावात प्रवेश केला तर त्याची जबाबदारी ही प्रशासनाची राहिल असा इशारा निवेदनात दिला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेत्यांना गावात प्रवेश नाकारणारे, कातवी हे मावळ तालुक्यातील पहिलेच गाव ठरले आहे.राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारसोबत भांडणारे आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना राज्यातील गावागावातील मराठा समाजाकडून पाठींबा मिळत आहे.अनेक गावांत साखळी उपोषण करण्यात येत आहे, तर अनेक ठिकाणी जरांगेच्या सभांना तोबा गर्दी होत आहे.












