शेजारी राहणार्याबरोबर सातत्याने होत असलेल्या भांडणाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कविता संजय श्रीवास्तव (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत त्यांचे पती संजय शामलाल श्रीवास्तव (वय ४५, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २९२/२३) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी अरीफ हरुन मुल्ला (वय ४२, रा. स्वामी विवेकानंद प्रेरणा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) याच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बालाजीनगरमधील प्रेरणा बिल्डिंगमध्ये १६ नोव्हेबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवास्तव आणि अरीफ मुल्ला हे स्वामी विवेकानंद प्रेरणा बिल्डिंगमध्ये तिसर्या मजल्यावर एकमेकांच्या शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यात नेहमी छोट्या मोठ्या कारणावरुन भांडणे होत होती. यातून त्यांनी यापूर्वी एकमेकांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारीही दिल्या होत्या. त्यावरुन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईही केली होती.या सततच्या भांडणाला कंटाळून कविता यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रिया राजगुरु तपास करीत आहेत.












