भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित
‘कथा कीर्तन महोत्सव’ ला चांगला प्रतिसाद
पुणे:
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित
‘कथा कीर्तन महोत्सव’ मध्ये दुसऱ्या दिवशी मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी ,सायंकाळी ६ वाजता देहू येथील ह .भ. प. आचार्य वैभव महाराज राक्षे यांच्या पारंपरिक वारकरी कीर्तन(भक्त प्रल्हाद कथा ) ला चांगला प्रतिसाद मिळाला .भक्त प्रल्हाद विषयावरील कथा कीर्तनातून जणू भक्तीचा मळा फुलला !
महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सवात हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नागलक्ष्मी राव, पुण्यभूषण फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी सूत्रसंचालन केले.
‘कीर्तन हा आनंदाचा भाग असायचा. पुण्यातही आफळेबुवा, निजामपुरकर बुवा अशा दिग्गजांची कीर्तन परंपरा होती.या परंपरेचे पुढचे पाऊल येथे कीर्तन महोत्सवा मुळे पडले आहे.ही सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम भारतीय विद्या भवन द्वारे होत आहे’, असे उद्गार पुण्यभूषण फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी यावेळी बोलताना काढले.
ह.भ.प.वैभव महाराज राक्षे यांनी ‘रूप पाहता लोचनी’, ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘परम अमृते रसना ओलावली,अशा अनेक पारंपारिक रचना सादर केल्या.
तुकाराम महाराज यांच्या परमामृत अभंगाच्या चार चरणाचे विवेचन त्यांनी केले. ‘अमृताने मनुष्य अमर होतो, हा परिणाम इतर कशाला येणे शक्य नाही.ज्यामुळे आपल्या प्राणाची धारणा होते, जग तरून जाते, ते परब्रह्मतत्व हेच अमृत आहे. भगवंताच्या नामामृताने इतर सर्व अमृताची प्राप्ती होणार आहे. त्याची आस बाळगली पाहिजे’, असे विवेचन त्यांनी केले.
सप्ताह भर कथा कीर्तन
बुधवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता श्रीमती अंजली कऱ्हाडकर व त्यांची कन्या शिवानी कऱ्हाडकर या माय – लेकींच्या “कीर्तन संवादाद्वारे ” (पुरंदर दास कथा )तिसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफले जाणार आहे. गुरुवार दि.३० नोव्हेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तन विशारद श्रेयस संजय कुलकर्णी यांच्या नारदीय कीर्तनाने सप्ताहातील चवथे पुष्प गुंफले जाणार आहे. सप्ताहातील पाचवे पुष्प शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तनचंद्र श्रेयस बडवे व किर्तन चंद्रिका सौ मानसी बडवे पती-पत्नीच्या ” कीर्तन जुगलबंदीने” गुंफले जाणार आहे. या मालिकेतील सहावे पुष्प शनिवार ,दिनांक २ डिसेंबर रोजीसायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने गुंफले जाणार आहे.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान ” कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या” या महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ माध्यमतज्ञ प्रा.डॉ. विश्राम ढोले, तत्वज्ञान व प्राच्य विद्या यांचे अभ्यासक व संशोधक डॉ. प्रणव गोखले सहभागी होणार असून ह .भ. प. प्रा. अभय टिळक हे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
याच दिवशी सायंकाळी सहा वाजता कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रारंभी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे “महाभारतातील किर्तन परंपरा” यावर व्याख्यान होणार असून त्यानंतर ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर होणार आहे.
भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे.प्रवेश मोफत आहे.












