सर्व मागण्या मान्य केल्याचे राज्य सरकारने सांगितल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मुंबईतील आंदोलन मागे घेत, आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र, आता राज्य सरकारवर शंका उपस्थित करत जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. तसेच येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व आमदारांना फोन करण्याचे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केले आहे. मनोज जरांगे यांची अंतरवालीत आज सकाळी महत्त्वाची बैठक. या बैठकीनंतर मनोज जरांगे उपोषणाला बसतील.
यासंदर्भात माहिती देताना मनोज जरांगे यांनी म्हटले की, सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणी बाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही. विधानसभेचे अधिवेशन होऊन गेल्यानंतर काहीच करता येणार नाही. नागपूरच्या अधिवेशनात असेच झाले. त्यावेळी अधिवेशन होऊन गेले. परंतु, आमचा प्रश्न सुटला नाही. जरांगे म्हणाले, आता १५ फेब्रुवारीपासून अधिवेशन आहे. परंतु, राज्य सरकारकडून पुन्हा तसा दगाफटका झाला तर
माझ्या समाजाला ते परवडणार नाही. म्हणून मी आज १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसत आहे.
जरांगे म्हणाले, मी सर्व मराठा बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांना फोन करावा. हा आडमुठेपणा नाही. त्या आमदारांवर लोकप्रतिनिधी म्हणून आमचा हक्क आहे. समाजाने मिळून त्यांना निवडून दिले आहे. आमच्या लेकरांचा विषय त्यांनी अधिवेशनात मांडावा. आरक्षणासाठी सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी अधिवेशनात बाजू मांडली तर आरक्षणाचा कायदा मजबूत होईल.