पुणे शहर हा स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. मात्र याच स्मार्ट सिटीच्या वाहतूक व्यवस्थेत पादचारी दुर्लक्षितच राहिला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याचा कारण असा कि शहरात ८२६ किलोमीटरचे रस्ते विनाफुटपाथ आहेत. सुमारे ५७४ किलोमीटरच्या रस्त्यावर फुटपाथ असला तरी त्यातील निम्म्याहून अधिक फुटपाथ अतिक्रमणांनी गिळंकृत केला आहे. या वाढत्या अतिक्रमणांमुळे अपघातास निमंत्रण मिळत असून, गेल्या वर्षभरात १२० पादचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात सुमारे १ हजार ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. शहरातील रस्ते हे पुणे महापालिकेच्या मालकीचे आहेत. शहरात रस्ते तयार करताना नागरिकांना पायी चालता यावे, तसेच कुठल्याही अडथळ्याविना त्यांना चालता यावे, यासाठी फुटपाथ तयार केले आहेत. पण, अनेक फुटपाथवर पथारी, हातगाडी व्यावसायिक, छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले आहे. अनेक दुकानदार व कार्यालयातील कर्मचारी फुटपाथवरच आपली दुचाकी, चारचाकी वाहने उभी करतात. विक्रेत्यांनी फुटपाथवर दुकाने थाटल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडीने हैराण असलेल्या पुणेकरांना फुटपाथवरून चालतानाही वाहनचालकांच्या अरेरावीला सामोरे जावे लागतो. पुणे महापालिकेने शहराच्या विविध भागांतील फुटपाथवर नागरिकांनी दुचाकी वाहने चालवू नयेत. अतिक्रमण करू नये, यासाठी सिमेंटचे ठोकळे बसविले आहेत. मात्र अनेक ठिकाणच्या फुटपाथवरील सिमेंटचे ठोकळे तोडण्यात आले आहेत. त्यामुळे फुटपाथवरून दुचाकीधारक बिनधास्तपणे वाहने चालवतात.
वाहतूक विषयी समस्या, तसेच उपाययोजनांबाबत सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट संस्थेकडून अपघाती मृत्यूंची वार्षिक आकडेवारी संकलित करण्यात येत असून, आकडेवारी अभ्यासण्यात येत आहे. पुणे शहरात २०२३ या वर्षभरात झालेल्या अपघातात ३५० नागरिकांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराचे मृत्यू सर्वात जास्त म्हणजे १९२ आहे. त्या खालोखाल पादचाऱ्यांचे १२० मृत्यू झाले आहेत. पादचाऱ्यांच्या अपघाताच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. २०२२ मध्ये अपघतातमध्ये पादचाऱ्यांचे १०६ मृत्यू झाले होते. प्रामुख्याने रस्ता ओलांडताना वेगाने आलेल्या वाहनाने दिलेली धडक आणि पाठीमागून आलेल्या वाहनांनी पादचाऱ्यांना दिलेली धडक या दोन कारणांमुळे अधिक अपघात होत आहेत. यामध्ये नियमांचे पालन केले जात नाही तसेच पोलिसांचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
“‘पादचारी रस्त्यांवरून चालत असतील, तर पदपथाचे डिझाइन कुठेतरी चुकले असणार’ ही खूणगाठ मनाशी बांधून असे पदपथ सुधारले पाहिजेत. दुर्दैवाने, पदपथ रुंद करायचा मुद्दा निघाला की, ‘पदपथ रुंद केला की, त्यावर पथारीवाले येतात’, अशा सबबीखाली तो मोडीत काढला जातो. पण, पदपथच नाहीत, अशा रस्त्यांवरही पथारीवाले दिसतातच. मग, रस्तेही बांधायचे नाहीत का? तेव्हा, पथारीवाले जिथे ग्राहक मिळतील अशा ठिकाणीच येतात, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांनाही पदपथांवर योग्य प्रमाणात, सुनियोजित जागा देऊन, पादचाऱ्यांना सोयीस्कर असलेले पदपथ बनवणे अत्यावश्यक आहे.”
-असे सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंटचे संचालक हर्षद अभ्यंकर म्हणाले