सायबर फ्रॉडमध्ये पैसे गमावल्यानंतर मौजमजेसाठी पैशांची गरज भासू लागली. यातून एका 18 वर्षाच्या तरुणाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून वडिलांना मेसेज करुन त्यांच्याकडे तीस हजार रुपयांची मागणी केली. मात्र, भारती विद्यापीठ पोलोसांनी तरुणाला लोणावळा येथून ताब्यात घेऊन त्याचा हा बनाव उघडकीस आणला.
याबाबत तरुणाच्या ४२ वर्षीय वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण शिक्षण घेत असून तो कात्रजमधील संतोषनगर येथे राहतो. सोमवारी (दि.१९) सायंकाळी सहाच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. परंतु रात्री उशीरापर्यंत तो घरी आला नाही. त्यानंतर रात्री उशिरा या तरुणाच्या मोबाईलवरुन वडिलांना मेसेज आला. त्यानंतर फोनवरुन शिवीगाळ करीत ‘जर मुलाला जिवंत बघायचे असेल तर, त्याच्या अकाऊंटला ३० हजार रुपये टाका; नाहीतर…’ असे म्हणत धमकी दिली. त्यानंतर पैसे टाकल्याच्या एक तासामध्ये मुलाला सोडण्यात येईल. कुठल्या प्रकारचा रिपोर्ट केला तर मुलाची अपेक्षा सोडून द्या. एका तासामध्ये पैसे आले तर ठीक आहे. अभी गुस्सा मत ला, तेरे लडके के अकाउंट में पैसे डाल. बोहत हो गया तेरा, अब देख मैं क्या करता हूँ,’ अशी धमकी दिली.
मुलाचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच पालकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी गांभीर्य ओळखून तात्काळ मुलाचा शोध सुरु केला. पोलीस ठाण्यातील एक पथक लोणावळा येथे रवाना करण्यात आले. या पथाने तरुणाला लोणावळा येथून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने मौजमजेसाठी पैशांची गरज होती. तसेच सायबर फ्रॉडमध्ये पैसे गमावल्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ- २ स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नरळे, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत कोळी व त्यांच्या पथकाने केली आहे.












