मारहाणीचा राग मनात धरुन टोळक्याने सिद्धार्थ हादगे याचा कोयत्याने सपासप वार करुन खून केला. ही घटना २० नोव्हेंबर २०२३ रोजी मध्यरात्री साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान गणेश पेठेतील काझी बिल्डींगच्या टेरेसवर घडली होती. याप्रकरणातील आरोपी ललीत पवन वंगारी, वैभव शहापुरकर व यश चव्हाण यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर यांनी जामीन मंजूर केला आहे. वैभव शहापुरकर आणि यश चव्हाण हे आंदेकर टोळीतील असून गुन्हा घडल्यानंतर एका महिन्याच्या आत आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.
काय आहे प्रकरण?
तुषार कुंदर आणि सिद्धार्थ नंदकुमार हादगे यांच्यामध्ये २०२१ मध्ये भांडण झाले होते. त्यावेळी हादगे याने तुषार व त्याचा भाऊ आशिष कुंदुर याच्यावर वार केले होते याचा राग दोघांच्या मनात होता. दरम्यान हर्षल पवार हा शेर-ए-पंजाब बार येथून जात असताना हादगे व त्याचा सोबतचा अक्षय अमराळे याने त्याला बोलावून घेतले. हादगे याने त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. हादगेच्या तावडीतून सुटून हर्षल घरी आला. त्याने मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर हर्षल पवार, आशुतोष वर्तले, प्रथमेश कांबळे, प्रतिक करपेकर, समर्थ वर्दैकर, भाऊ आशिष कुंदुर, वैभव शहापुरकर, आयुष बिडकर, ललीत वंगारी, यश चव्हाण असे सर्वजण शिवरामदादा तालीम समोरील इमारतीत गेले. त्याठिकाणी सिद्धार्थ हादगे याच्यावर वार केले तसेच आशितोष वर्तले याने आणलेल्या दगडाने ठेचून त्याचा खून केला.
खून प्रकरणात आरोपी ललीत पवन वंगारी, वैभव शहापुरकर व यश चव्हाण याला अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीने अॅड. मिथून चव्हाण यांच्या मार्फत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. अॅड. चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने ललीत वंगारी याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.











