पिंपरी- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कंपनीच्या मालकीच्या कन्नड सहकारी कारखाना लि. या कारखान्याची १६१.३० एकर जमीन, प्लांट आणि यंत्रण, इमारत इत्यादी जप्त केले आहे. या संपत्तीची एकूण रक्कम ५०.२० कोटी असल्याची माहिती ईडीने दिली आहे. ईडीने ही कारवाई केल्यानंतर रोहित पवार यांनी ‘एक्स’वर एक सूचक पोस्ट केली असून यात सवाल केला आहे की, भाजपमध्ये जायला पाहिजे का?
दरम्यान, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने धाड टाकून चौकशी केली होती. याबद्दल रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर आज ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईची माहिती ईडीने ‘एक्स’च्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट करून दिली आहे.या कारवाईनंतर रोहित पवार यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली असून यामध्ये म्हटले आहे की, माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचे ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?
पण भाजपाने लक्षात ठेवावं… झुकणारे आणि रडणारे गेले. आता फक्त लढणारे शिल्लक आहेत. आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय.
पोस्टमध्ये रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का?
पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे. अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही. लडेंगे जितेंगे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.