मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची लाट राज्यात कित्येक महिन्यांपासून उसळली आहे. राज्यात उभं केलेलं हे (मराठा) आंदोलन जिरवायचं नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडवता आला असता. पण ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लावला आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे आणि मराठा समाजाचे ताट वेगळे असले पाहिजे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. पण माझा जरांगे पाटील यांना प्रेमाचा सल्ला आहे की, आता उभे केलेले आंदोलन जिरवायचे नसेल, तर तुम्हाला निवडणुकीत उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही.
निवडणुकीत उभे राहिला नाहीत, तर इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहू दिल्या नाहीत. आपण गरिबांच्या आणि उपेक्षितांच्या चळवळी उभ्या करत आहोत या चळवळीमध्ये एकजूट होणे महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केलं. मंगळवारी पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन महासभा झाली. त्यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते.
आगामी निवडणूक पक्षाची नाही, तर ती आपली स्वतःची आहे. इथे सत्तेवर कोणाला बसवायचे याची निवडणूक नाही, तर या ठिकाणी आपले अधिकार शाबूत ठेवण्याची ही लढाई आहे, असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले. उद्याची व्यवस्था काय असेल, याची चुणूक या सरकारने दाखवली आहे, त्यामुळे आतापासून सावध राहा, असे आवाहनही त्यांनी केले.