मुंबई/प्रतिनिधी: महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन काढलंच नाही. त्यामुळं महाराष्ट्रात हा कायदाच अस्तित्वात आला नाही. महाराष्ट्रातील पत्रकारांची सरकारनं घोर फसवणूक केली. याची संतप्त प्रतिक्रिया माध्यम जगतात उमटली आहे. या संदर्भात सर्व संघटना लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असुन पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणी साठी नोटिफिकेशन जारी करण्याचा आग्रह धरणार आहेत.
बुधवारी मुंबईत विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत यासंदर्भात बैठक घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. सरकारने तातडीने नोटिफिकेशन काढून पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच पुर्वी सरकारी पत्रकार संरक्षण समित्या होत्या. त्या समित्यांचे पुनर्गठन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सरकारनं सर्व प्रमुख संघटनांची बैठक बोलावून पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे एस.एम.देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद अष्टीवकर, गणेश मोकाशे, दीपक कैतके, राजा आदाटे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, संदीप चव्हाण, राही भिडे,स्वाती घोसाळकर, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीरसिंग, जतीन देसाई, टीव्हीजेएचे विनोद जगदाळे, बीयूजेचे इंदरकुमार जैन, क्राईम रिपोर्टर असोशिएशन विशाल सिंग, म्हाडा पत्रकार संघटनेचे दीपक पवार, राजेंद्र सालसकर, आदि उपस्थित होते.