सुरक्षितता अभियानाच्या माध्यमातून चालक व इतर कर्मचाऱ्यांच्यामध्ये जनजागृती करून वर्षभर ” अपघात शून्य एसटीचे ध्येय ” साध्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील,असा विश्वास एसटी महामंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला.एसटीने सुरू केलेल्या सुरक्षितता अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना कुसेकर म्हणाले की गेली ७५ वर्षे पेक्षा जास्त काळ महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला हक्काचे प्रवासी दळणवळणाचे साधन म्हणून एसटी सुरक्षित सेवा देत आहे. म्हणूनच ” सुरक्षित प्रवास.. म्हणजे एसटीचा प्रवास…!” असा विश्वास सर्वसामान्य प्रवाशांच्या मनात तयार करण्यात एसटी यशस्वी झाली आहे. हा विश्वास आणखीन वृद्धिंगत करण्याचा महामंडळाचा प्रयत्न राहणार आहे.
अपघात विरहित सेवा देण्यामध्ये चालक हा महत्त्वपूर्ण घटक आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती कर्तव्यावर असताना चांगली राहील, असे वातावरण निर्माण करणे हे एसटीचे अधिकारी व पर्यवेक्षक यांचे महत्त्वाचे काम आहे. असे कुसेकर म्हणाले. त्यासाठी कर्मचाऱ्याचे विश्रांतीगृहे, तेथील प्रसाधनगृहे अत्यंत स्वच्छ असली पाहिजेत. त्यांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी पुरेशी झोप मिळाली पाहिजे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या वेळोवेळी झाल्या पाहिजेत. चालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
डुलकी लागणे व वेगाने वाहन चालवणे ही अपघातामागची प्रमुख कारणे आहे. एसटी चालकांनी याबाबत जागृत राहिले पाहिजे.त्यासाठी कर्तव्यावर जाण्यापूर्वी आपला आहार आणि पुरेशी झोप याबाबत दक्षता घेतली पाहिजे.












