लातूर : गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे जग हातातील मोबाईलमध्ये आलं आहे. मात्र, त्यासोबत नात्यातील दुरावा वाढत चालला आहे. नातेसंबंधांपेक्षा संपत्ती आणि त्याचं प्रदर्शन याला जास्त महत्त्व आल्याचे पाहायला मिळत आहे.यातून ऐकमेकांच्या जीवावर उठल्याच्या घटना घडत आहेत. अशाच एका गुन्ह्याने लातूर जिल्हा हादरला आहे. संपत्तीच्या वादातून नातवाने 95 वर्षीय आजोबांचा खून केला आहे.
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील सुमठाना येथे घराच्या व शेतीच्या वाटणीवरून नातवाने तुकाराम दशरथ किवंडे या 95 वर्षीय वयोवृद्धाच्या डोक्यात जाड लाकडाने मारून खून केल्याची घटना समोर आली. शेतात असलेल्या घरात ही घटना घडली असून खून करून नातू बुद्धानंद राजेंद्र किवंडे हा पळून जात असताना उदगीरच्या बसस्थानकातून वाढवणा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतलं. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वाढवणा पोलीस करत आहेत.
उदगीर तालुक्यातील सुमठाना येथे मयत तुकाराम किवंडे यांची वडिलोपार्जित शेती आहे, या शेतीच्या वाटणीकरून माझ्या नावे शेती करण्याचा अट्टहास मयताचा नातू आरोपी बुद्धानंद किवंडे याने केली होती. त्यामुळे आजोबा आणि नातवात वाद झाले आणि त्याचाच राग मनात धरुन आरोपिने 95 वर्षीय आजोबाच्या डोक्यात जाड लाकुड घातले. तसेच छातीवर आणि पोटावर देखील लाकडाने मार दिला. त्यातच आजोबाचा जीव गेला. आरोपी विरुद्ध कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












