पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत उमेदवारी मागून निवडून येणे आता सोपे राहिलेले नाही, असे म्हणत मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे असा दावा मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला. ते तळेगाव येथे बोलत होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडांवर मावळमधील उमेदवारीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) चुरस वाढण्याची शक्यता आहे.
शेळके म्हणाले, खासदार बारणे यांना 2014 मध्ये उमेदवारी मिळण्यासाठी आम्ही तन-मन-धनाने प्रयत्न केले. युतीमधील कार्यकर्ते असल्याने दोन्हीवेळी प्रामाणिकपणे त्यांचे काम केले. पंतप्रधान मोदी यांच्या करिष्म्याने ते दोन्ही वेळेस निवडून आले. यात नक्कीच त्यांचेही काही योगदान असेल. परंतु, त्यांनी आजपर्यंत मला पुन्हा संधी पाहिजे, असे वक्तव्य केलेले मला तरी दिसून आलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत उमेदवारी मागून निवडून येणे आता सोपे राहिलेले नाही. इथे राष्ट्रवादीची काँग्रेसची मोठी ताकद असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, असा आमचा हट्ट राहणार आहे. आता बारणे यांनी पुन्हा इच्छा व्यक्त केली तर त्यांनी मावळमधील जनतेला केंद्रातील किती योजनांचा लाभ दिला, कोणते मोठे प्रकल्प आणले याची माहिती द्यावी. मुंबई-पुणे महामार्गावर उड्डाणपुलाची कामे, तळेगाव, भेगडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांचा मिसाईल प्रकल्पातील प्रश्न, तळेगाव दाभाडे, लोणावळ्यासह रेल्वे स्टेशनबाबतील अडचणी का सोडवल्या नाहीत, त्यात काय अडचणी आल्या. नऊ वर्ष सत्तेत असूनही हे प्रश्न का प्रलंबित राहिले याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे आव्हानही शेळकेंनी दिले.












