शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१५) संध्याकाळी चंदीगडमध्ये केंद्र सरकारच्या तीन मंत्र्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे.
यापूर्वी दोन बैठका झाल्या आहेत. आज तिसरी बैठक पार पडणार आहे. आज तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. मात्र, आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीनंतरच पुढील रणनीती ठरवली जाईल, असे पंजाब मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सरवनसिंग पंधेर यांनी सांगितले आहे. आज दिवसभर शेतकरी शंभू सीमेवर शांततेत बसून आंदोलन करणार आहेत. हमीभाव कायदा आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाआहे.
आज मंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीबाबत पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सरवनसिंह पंधेर यांनी आजच्या बैठकीत नक्कीच काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही आजच्या बैठकीला पूर्णपणे सकारात्मक उपस्थित राहणार असून या बैठकीत काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी बैठकीपूर्वी बैठकीला उपस्थित असलेल्या तीन मंत्र्यांशी चर्चा करावी. जेणेकरुन आम्ही आमच्या मागण्यांवर तोडगा काढू शकू, अशी आमची इच्छा आहे. तसंच दिल्लीत शांततेने आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, असेही पंधेर म्हणाले.
केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, पियुष गोयल आणि नित्यानंद राय आज संध्याकाळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या वेळी शेतकरी नेत्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत घरी परतणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. याआधीही दोन्ही पक्षांमध्ये दोन बैठका झाल्या होत्या. परंतु या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतरच 13 फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. राजनाथ सिंह आणि अर्जुन मुंडा यांच्यासह वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी बुधवारी चालू असलेल्या शेतकरी आंदोलन आणि संबंधित समस्या सोडवण्यासाठी चर्चा केली असल्याची माहिती एका वृत्तसंस्थनेने दिली आहे.












