आष्टी ( प्रतिनिधी)
न्यायदानाच्या कामांमध्ये गती येण्यासाठी परंपरागत फिजिकल फायलिंग ऐवजी यापुढे ” ई-” फायलिंग करण्यासाठी वकिलांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे कारण, ” ई ” फायलिंग ही काळाची गरज बनलेली आहे..
असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.रवींद्र जोशी यांनी केले… आष्टी येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते.. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.राजेंद्र अवचट प्रमुख पाहुणे म्हणून तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री.आनंद यावलकर हे होते. या वेळी व्यासपीठावर मुंबई गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. मिलिंद पाटील, आष्टी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती पूजा इनामदार हे उपस्थित होते न्यायमूर्ती श्री.रवींद्र जोशी पुढे बोलताना म्हणाले की,आष्टीतील न्यायालयाची नवीन इमारत हे “न्याय मंदिर ” असून हिचे पावित्र्य राखावे वकिलांनी पक्षकारांसोबत उघड्यावर न्यायालयाच्या आवारात न बसता न्यायालयाच्या आतील बाजूस बसून पक्षकारांसाठी काम करावे आता नवीन इमारत असल्यामुळे नवीन ऊर्जा आपणास प्राप्त झाली असल्यामुळे या नवीन इमारतीतून चांगले काम निर्माण होईल आता आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून इमारतीची स्वच्छता आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी वकील, पक्षकार आणि सर्व कर्मचाऱ्यांची असल्याचे सांगून ते म्हणाले की वर्षानुवर्षे अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ असून यापुढे लवकर प्रकरणे निकाली काढण्यासाठी ई-फायलिंग पद्धत अवलंबण्यात येत असून आम्ही देखील या नवीन तंत्रज्ञानाशी जोडले गेलेले नसलो तरी आम्ही देखील अभ्यास करून या नवीन तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत सर्व वकिलांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून ” ई ” फायलिंग साठी तयार राहावे आपले ज्ञान अद्ययावत करावे असे त्यांनी शेवटी सांगितले… तसेच आष्टी येथील याच न्यायालयामध्ये अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांची नियुक्ती व्हावी.. तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन व्हावे यासाठी आष्टी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या निश्चित करून परिपूर्ण प्रस्ताव तयार करा त्यासाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी बोलताना मुंबई गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. मिलिंद पाटील म्हणाले की बीड जिल्हा हा गतिमान असून या ठिकाणी चांगले काम सुरू आहे आष्टीच्या नवीन इमारती कडे पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगले काम केल्याचे सांगत या परिसरातील वृक्षांची लागवड केली आहे त्याच्या संगोपन करण्याची जबाबदारी सर्वांची असून अशा या नवीन इमारतीमुळे कामाची ऊर्जा वाढत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगून ते म्हणाले की महाराष्ट्र गोवा कौन्सिल तर्फे प्रत्येक न्यायालयामध्ये कोर्ट लायब्ररी साठी प्रयत्न सुरू असून संगणक प्रिंटर आणि संगणक परिचालक यांचे अर्ध्या किमतीमध्ये बार कौन्सिल मार्फत व्यवस्था करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले
तसेच सन २०२० पासून नोंदणी करणाऱ्या प्रत्येक विधीज्ञासाठी मोफत पुस्तक वाटप करण्यात येत असून वकिलांनी अपग्रेड होण्यासाठी या पुस्तकाचे रामायण, महाभारत,आणि दासबोध याप्रमाणे पारायण करावे आणि आपल्या व्यवसायात उज्वल यश मिळवावे असे सांगीतले आष्टी तालुक्यातील शेवटच्या गावापासून बीड पर्यंत चे अंतर १४० कि.मी.असल्यामुळे नागरिकांची अडचण होत असल्याने येथील वरिष्ठ स्तर न्यायालयाची मागणी रास्त असून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ७५ व्या दिन १७ सप्टेंबर २०२३ पूर्वी हे काम झाल्यास आष्टी तालुक्यातील जनता समाधानी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला
अध्यक्ष स्थानावरून बोलताना बीडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री आनंद यावलकर म्हणाले की आष्टी येथील इमारत भव्य दिव्य आणि प्रशस्त असून १९१२ पासून आष्टीतील न्यायालय सुरू असल्याने प्राचीन परंपरा येथील न्यायदानाला लाभलेली आहे
या भव्य दिव्य इमारतीमध्ये ई-फायलिंग साठी मागणी केल्या स्वतंत्र जागा देण्यात येईल ही संपूर्ण इमारत अतिशय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी उद्यापासून या नवीन इमारतीत कामकाज चालू करावे असेही त्यांनी शेवटी सांगितले
आभार प्रदर्शन करताना आष्टी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती पूजादेवी इनामदार म्हणाल्या की न्यायदान हे ईश्वरीय कार्य असून या भव्य दिव्य इमारती चे मंदिरासारखे पावित्र्य जपावे पक्षकारांनी आणि वकिलांनी सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करावेत
ही वास्तू निर्मितीसाठी प्रयत्न केलेल्या सर्व घटकांचे त्यांनी आभार मानले












