मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळावं यासाठी विधेयक एकमताने आज विधिमंडळात मंजूर करण्यात आलं. हे विधेयक मांडण्यासाठी आज विशेष अधिवेशन घेण्यात आलं होतं.
या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिकेल असं आरक्षण आम्ही देत आहोत असा उल्लेख केला आहे. तर एकमताने विधेयक मंजूर झाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील खूश नसल्याचं दिसत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचं तर आम्ही स्वागतच केलं आहे. मात्र आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. कोट्यावधी मराठ्यांची मागणी ओबीसीमधून आरक्षण देण्याची आहे. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करा अशी मागणी केली आहे.
जे आम्हाला हवे ते आम्ही मिळवणार, विश्वास ठेवला म्हणून आंदोलन इतके दिवस चालले 6 महिने वेळ दिला होता. बुधवारी अंतरवलीत बैठक घेऊन आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. त्यासाठी सर्वांनी 12 वाजता उपस्थित राहावं असं मनोज जरांगे यांनी आवाहन केलं आहे.
जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा पवित्रा कायम आहे. दिलेल्या आरक्षणाचे स्वागत केले पण ही आमची मागणी नाही. कुणाच्या दबावाखाली येऊन त्यांनी आमचे नुकसान करू नये. त्यांनी 2,3 लोकांसाठी मराठा समाज वेठीस धरू नये. सगेसोयरे अंमलबजावणी घेऊ त्याशिवाय माघार नाही, कसे देत नाही तेच बघतो.
काहींना पाहिजे होते ते त्यांना मिळाले, पण हे नाही टिकले तर मराठ्यांची पोरं मरतील. आमचे एव्हढेच म्हणणे आहे की त्यांनी आज सागेसोयरे कायदा पारित करायला हवा होता. हे समाजाची चेष्टा करत आहे. माझी आडमुठेपणाची भूमिका असती, तर सहा महिने वेळ दिला नसता. मराठ्यांची शक्ती आणि गरज उद्या त्यांच्या लक्षात येईल असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.आम्हाला शेवटी तोच दिवस बघायला लावला. जे दिसतंय ते उघड आहे मागणी एक मान्य वेगळी केली. शेकडो मराठे रस्त्यावर उतरले त्यांची मागणी मान्य नाही केली. मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव आहे तो उद्या सांगू उद्या ते सर्व उघडे पडतील.












