मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्जाची परतफेड करता येत नव्हते. कर्ज घेतलेल्यांकडून होत असलेल्या तगाद्याला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
बजरंग शिंदे (रा. शिवदशृन अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ही घटना शिंदे यांच्या राहत्या घरी १० नोव्हेबर रोजी घडली. याबाबत प्रेमला बजरंग शिंदे (वय ४७, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ७४६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रामभाऊ नामदेव कोंढरे, सोमनाथ कोंढरे आणि राजाराम बापू बँकेचे धनकवडी शाखेचे मॅनेजर अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग शिंदे हे बांधकाम कंपनीत सुपरवायझर म्हणून काम पहात होते. त्यांनी दोन मुलांच्या शिक्षणासाठी कोंढरे यांच्याकडून एक लाख व अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते. तसेच राजाराम बापू बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतले होते. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्यांच्याकडे काम नव्हते. त्यामुळे ते कर्जाचे पैसे परत करु शकत नव्हते. त्यामुळे पैसे परत मिळण्यासाठी त्यांच्याकडे तगादा लावण्यात आला होता.याचा मानसिक व आर्थिक त्रास सहन न झाल्याने बजरंग शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.












