महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांची याचिका मान्य करत कल्याण पोलिसांनी त्यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द केला आहे.
सन २०१० मध्ये पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश बजावलेला असतानाही कल्याण शहरात प्रवेश केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१० मध्ये कल्याण महापालिका निवडणुकीच्या वेळी २९ सप्टेंबर २०१० रोजी रात्री १० वाजल्यानंतर थांबू नये आणि शहरात कुठेही वास्तव्य करू नये, कुठेही गाठभेट घेऊ नये, असे निर्देश पोलिस उपायुक्त यांनी दिलेला होता. त्याचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी राज ठाकरे यांना नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राज यांनी ती स्वीकारली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ते ज्या ठिकाणी होते, तिथे ती चिकटवली होती.
त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात कल्याण कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. त्या आरोपपत्राची दखल घेत कोर्टाने समन्स बजावल्यानंतर राज ठाकरे यांनी फेब्रुवारी २०११ मध्ये कोर्टात हजेरी लावून जामीन मिळवला होता. त्यानंतर गुन्हा आणि खटला रद्द होण्यासाठी त्यांनी हायकोर्टात याचिका केली होती.
त्यावरील सुनावणीअंती न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी १३ ऑक्टोबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. तो आज जाहीर करण्यात आला. त्यानुसार कल्याण पोलिसांनी त्यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.












