विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड संघांतील कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतला होता. त्यानुसार भारतीय संघाने पहिल्या दिवशी ९३ षटकानंतर यशस्वी जैस्वालच्या नाबाद १७९ धावांच्या जोरावर सहा गडी गमावून ३३६ धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे.
दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात सहा गडी गमावून ३३६ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल १७९ धावांवर नाबाद असून रविचंद्रन अश्विन पाच धावांवर नाबाद आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली होती. रोहितने यशस्वीसह पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. तो १४ धावा करून बाद झाला. यानंतर यशस्वीने शुबमन गिलसह दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली.
शुबमन पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आणि ३४ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. श्रेयस अय्यर २७ धावा करून झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी श्रेयसने यशस्वीसोबत ९० धावांची भागीदारी केली. कसोटी पदार्पण करणारा रजत पाटीदारने ३२ धावांची खेळी केली आणि तो दुर्दैवाने बाद झाला. त्याने यशस्वीसोबत ७० धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वीने अक्षरसोबत ५२ धावांची भागीदारी केली.












